मंडणगड (प्रतिनिधी) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते, उत्तर रत्नागिरी जिल्हा संवादक अमोल चोरगे यांच्या सहकार्याने अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या माध्यमातून समरसता संकल्प अभियान व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मंडणगड तालुक्यात केले.पवित्र गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलित करून गुरुपौर्णिमा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी संत गुरु रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर व विचारांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “संत रविदास महाराजांनी समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत समाजाला योग्य दिशा दिली. त्यांचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवून सामाजिक समरसता आणि ऐक्य दृढ करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमातील प्रमुख समाजबांधव अरविंद नांदगावकर, वाल्मिक परहर आणि संतोष दाभिळकर यांनीही संत गुरु रविदास महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्याचा आढावा घेतला. संतांचे समरसता, समानता आणि बंधुभावाचे तत्त्वज्ञान आजच्या समाजासाठी अत्यंत मार्गदर्शक असून प्रत्येकाने ते आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमात सामाजिक समरसतेचा संकल्प करण्यात आला आणि संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.








